रत्नागिरी : राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शहरातील देवळेकर मैदानावर एक ते पाच मार्च २०१९ या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘आत्मा’च्या सहयोगाने या महोत्सवाच्या माहिती प्रसारणाचे काम केल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशनला महोत्सवात गौरविण्यात आले.
रिलायन्स फाउंडेशन ही रिलायन्स इंडस्ट्रीजची एक सामाजिक संस्था आहे. फाउंडेशन संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये काम करत असून, कोकण विभागामध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. मच्छिमार, शेतकरी आणि पशुधन मालकांना उच्च उत्पन्नासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य वेळी योग्य माहितीची आवश्यकता असते. ही माहिती विविध कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, ‘आयएनसीओआयएस’, विविध शासकीय विभाग यांच्याकडून घेऊन ती या शेतकरी पशुपालक, शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ‘रिलायन्स’मार्फत केले जाते. माहिती आणि कम्युनिकेशन टेक्नोलॉजीज (आयसीटी) वापर करून मच्छिमार, शेतकरी, पशुपालक, तसेच महिलांना त्यांचा व्यवसायासंबंधी योग्य माहिती दिली जाते. ही माहिती पोहोचविण्यासाठी ‘रिलायन्स’तर्फे ध्वनी संदेश, व्हाट्सअॅप, स्थानिक वृतपत्र यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो.
मच्छिमारांना एक दिवस आधी समुद्रातील हवामानाची, वादळाची पूर्वसूचना देणे, शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित पीकनिहाय माहिती देणे, नवीन शासकीय योजना, नवीन वाण, लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व माहिती शेतकऱ्यांना देणे, तसेच स्थानिक रोजगार मेळावे, शासकीय, अशासकीय नोकरीसंदर्भात माहिती पोहोचविण्याचे काम ‘रिलायन्स’ करते.
शेतकरी, पशुपालक, मासेमारांच्या समस्या तत्काळ निवारण्यासाठी नि:शुल्क हेल्पलाइन (१८० ०४१९ ८८००) सुरू असून, यावर तज्ज्ञ व्यक्तींकडून समस्यांचे निरसन केले जाते. त्याचप्रमाणे गावपातळीवर शेती, पशुपालन, मासेमारीसंबधी कार्यक्रमांचे आयोजनाबरोबरच ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्स, प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जातात.
या माहिती प्रचाराचा एक भाग म्हणून ‘आत्मा’च्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा कृषी महोत्सवाच्या माहिती प्रसारणाचे काम ‘रिलायन्स’ने केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथे स्थानिक वृत्तपत्रांद्वारे कृषी महोत्सवाची माहिती प्रसारित केली. त्याचप्रमाणे ध्वनी संदेश, व्हाट्सअॅप अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत या कृषी महोत्सवाची माहिती पोहोचविण्याचे काम केले. ‘रिलायन्स’ने केलेल्या या सहकार्याची दखल घेत ‘आत्मा’तर्फे ‘आत्मा’च्या प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिकळे, प्रकल्प संचालक गुरुदत काळे यांनी ‘रिलायन्स’चे कार्यक्रम सहाय्यक विक्रम जाधव, विनोद गवाणकर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे व्यवस्थापक राजेश कांबळे यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आणि त्यांचे आभार मानले.